भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : _
” घरी चाललाच आहेस तर जातांना थोडा वानोळा घेऊन जा. रिकाम्या हाताने जाऊ नये.” !!
आत्याच्या तोंडुन वरील वाक्य ऐकले आणि “वानोळा ” शब्द मनात घर करून राहिला.
वाणोळा या शब्दाचा पुस्तकी अर्थ वाहता पाट किंवा कालवा.*
*पण गावाकडे रूढार्थाने हा शब्द वापरला जातो तो एकमेकांच्या घरी जाताना आपुलकी ने सोबत घेतलेली दिलेली भेट वस्तू.किंव्हा आपल्या शेत शिवारात पिकलेला भाजिपाला, फळं, किंवा घरगुती तयार केलेले वान विदर्भ मराठवाड्यात याला पोठं, कोकणात भ्याट असं म्हणतात.
नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेले
तेव्हाआजच्या सारखी चॉकोलेट, कॅडबरी नव्हती मिळत., किंवा अशी भारी किमतीची चकचकीत मिठाइचे बाक्स देखील नाही मिळायची पाहुण्यांना निरोप देताना
*तेव्हा पाहुण्यांना निरोप देताना मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, घरचं गुराळ असलं तर काकवी, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली डाळी, ओल्या हरभऱ्याचा भाजलेला उळा, , शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची आणि लसनाची जुडी.
आणि तालेवार असल बागायतदार घर असलं तर टोपलीभर पेरू, पपई, आंबा सारखी फळे, आणि अजून खानदेशी श्रीमंत घरात गेले की मिळायचा केळीचा मोठा घड, तोही पूर्ण आठ,दहा डझनभर केळी लपेटलेला.
मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा, तोवर त्या वानोळा देणाऱ्या नातलगांची आठवण रोज निघायची..
तो वानोळा केवळ जिन्नसा नसायचा, ती माया असायची. प्रेम असायचे, हृदयातून पोटा पर्यंत जाणारा आपुलकीचा ओलावा असायचा…
वाळवणाचे अर्थात उन्हाळी सार सामान बनवायचे दिवस असले की, मग तर बघणेच नको.नागली, उडिद पापड, कुरडई,प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी वानोळा हा जायचाच
ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा..
*सगळ्यात विशेष म्हणजे कैरीचे लोणचे. मसाला तोच, कैऱ्या त्याच, पद्धतही तीच
तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी…
गावातील कोणीही शहराकडे जात असेल तर तेथे राहणाऱ्या आपल्या नातलगाला कापडाच्या पुरचुंडीत बांधून दिलेली भेट, हा वाणोळ्याचाच अस्सल गावरान प्रकार होता. कोकणातून शहरात आलेल्या भेटीत मुख्यतः खाजे, कुळीथ, सुकी मच्छी, नारळ, आणि मोसमाप्रमाणे काजू आंबे किंवा आमसुले असायची.* आंब्याच्या हंगामात हमखास आंबे आणि खांपरावरच्या पुरण पोळीचा वानोळा, शहरातील नातेवाईकांना पोहच केला जायचा,
थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्या च्या निमित्ताने माणसे आणि घर परस्परांच्या हृदयात राहायची…
एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्लीत वाटलं जायचं…
आणि आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येते तरी आपल्याला बारशाला आवाजावरून कळते. हे वास्तव आहे.
अशावेळी खरेच वाटते, आपण खरच सुधारतो आहोत की माणसां पासून दुरावतो आहोत…
*जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता. माणूस ज्यास्त शहाणा सुशिक्षित झाला, वानोळ्याची ही लाज वाटायला लागली आणि मने दुरावत गेली….*
मग वानोळ्याची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली….
जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया,स्नेह, आपुलकी विसरायला लागला..
सगळे कसे प्रॅक्टिकल होत गेले आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथे मध्येच बंद झाल्या..
तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवे आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो..
*माहेरवाशीण आता केवळ गोष्टीं मधेच सापडते, तिच्या गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते*
तरी अजूनही तुमच्या माझ्या सारख्यांची आई,आत्या,निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच वानोळा असतो
*देत राहणाच्या संस्काराचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा, दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो तो वानोळा*.!!
*पण तो अस्सल वानोळा खरेच कुठेतरी हरवला हे निश्चित…!!!
लेखक / शब्दांकन _ कुबेर जाधव विठेवाडीकर,९४२३०७२१०२





