भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क – 9158417131
मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदरे व खनिकर्म मंत्री ना.दादा भुसे यांचे हस्ते १०० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाचे भूमीपूजन रविवारी आणि सोमवारी मालेगावी नुकतेच पार पडले असून आरोप प्रत्यारोपांच्या पूजनाचा आरंभही झाला.त्यामुळे मालेगाव वासियांना एक चर्चेचे गुऱ्हाळ मिळाले.नगरविकास विभाग आणि मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून रस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने हा पूजनाचाच कार्यक्रम रस्त्यावर आला. ना.दादा भुसे ,मालेगाव मध्यचे आ.मौलानामुप्ती इस्माईल यांनी तर माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते रशीद शेख यांनी पत्रकार परिषद घेत आप आपली बाजू जनतेपुढे उभी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मालेगाव महानगरातील रस्ते विकासासाठी उपलध झालेला १०० कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला आहे.यात ३० टक्के निधी महापालिकेचा असून याचा आर्थिक बोजा शहरातील नागरिकांच्या माथी पडणार आहे.शहरासाठी विकासनिधी आणताना पालकमंत्री दादा भुसे यांनी कायमच भेदभाव केल्याचा आरोप माजी आमदार शेख रशीद यांनी यावेळी केला.त्यांनी पुढे सांगितले की,महापालिकेत काँग्रेस शिवसेना एकत्रित सत्तेत असताना २०० कोटी रुपयांचा शहर विकास आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विकास कामांचे प्रस्ताव मागितले होते.त्यामुळे डीपीआर तयार करताना शहराच्या पूर्व व पश्चिम भागात विकासाचे कामे प्रस्तावित केली होती.पालकमंत्र्यांनी मात्र विकासनिधी देताना भेदभाव केल्याचे शेख यांनी सांगितले.बाह्य मतदार संघातील द्याने,रमजानपुरा , म्हाळदे ,दरेगाव या मतदारसंघात भुसे यांनी कधीही लक्ष दिले नसून या भागात झालेली विकासकामे मनपा फंडातून झाल्याचेही त्यांनी सांगितले तर मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की मालेगाव महानगरातील विकास कामांसाठी निधी आणताना कधीही भेदभाव केला नाही.महापालिकेत काँग्रेस सोबत सत्तेत असताना शहराच्या मुस्लिमबहुल पूर्व भागात ७७ कोटी रुपये खर्च करून कामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे विकास निधीवरून जाणीवपूर्वक काही मंडळींकडून राजकारण केले जात असलयाचा आरोप भुसे यांनी यावेळी केला.विरोधकांना विकास कामांमधूनच उत्तरे मिळतील असे सांगून तत्कालीन नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती त्याची आश्वासनपूर्ती त्यांनी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.