भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१
देवळा / माळवाडी क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि अध्यात्मिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने माळवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात पाच दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरासाठी कल्याण येथील राष्ट्रीय वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष ह. भ. प. संतोष महाराज यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी पाच दिवस विद्यार्थ्यांना श्लोक, हरिपाठ, अभंग आणि गवळण यांचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या साध्या, सोप्या आणि प्रभावी शैलीमुळे विद्यार्थ्यांना अध्यात्मिक विषय सहज समजले.
शिबिरादरम्यान दररोज
प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होत असे. त्यानंतर
सामूहिक श्लोक पठण, हरिपाठ आणि अभंग गायन करण्यात येत होते. संतोष महाराज प्रत्येक घटकाचा अर्थ स्पष्ट करून सांगत असल्यामुळे विद्यार्थ्यांची आवड अधिक वाढली. गवळण आणि अभंग सादरीकरणातून वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
या उपक्रमाचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना टाळ कशी योग्य पद्धतीने वाजवावी याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. ताल, लय आणि शिस्त यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि समूहभावना विकसित झाली.
आपल्या मार्गदर्शनात संतोष महाराज यांनी भक्तीभाव, साधेपणा आणि चांगल्या आचार-विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “ अध्यात्म म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून चांगले वर्तन आणि सकारात्मक विचार यांची जोपासना करणे होय,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
याचबरोबर, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम याविषयीही महाराजांनी मार्गदर्शन केले . मोबाईलचा अतिरेक केल्यास अभ्यासावर परिणाम होतो, एकाग्रता कमी होते आणि वेळेचा अपव्यय होतो, याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून वाचन, अभ्यास आणि चांगल्या सवयींवर भर द्यावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिकलेल्या श्लोक, हरिपाठ आणि अभंगांचे सादरीकरण केले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी.सोनजे सर तसेच सर्व शिक्षकांनी संतोष महाराज यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.माळवाडी येथील महात्मा फुले विद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि अध्यात्मिक मूल्यांची रुजवण करणारा ठरला असून, शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणारा आदर्श उपक्रम ठरला .






