नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ नवी मुंबईत रिपाइंचा रिपब्लिकन मेळावा नुकताच पार पडला. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा. आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा, भाजप आरपीआय युतीच्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार आहे नवी मुंबईच्या चकरा! अशी कविता सादर करून नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित रिपाइंच्या रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्याला आठवले यांनी संबोधित केले. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष युती करून किमान 8 जागांवर आपले उमेदवार उभे करील. भाजपला २५ जागांची यादी दिली असून त्यातील ८ जागा रिपाइंला सोडण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याचे रामदास आठवले म्हणाले.’मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला मोठा मानतो. मंत्रिपद असो की नसो मी रिपब्लिकन पक्षाचा गाडा पुढे घेऊन जात आहे. जनता माझ्या सोबत आणि मी जनतेसोबत आहे’, असंही आठवले म्हणाले.
![](https://www.kasamadetimes.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240125-WA0122.jpg)