देवळा:क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_प्रतिनिधी _गेल्या काही दिवसांत सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका ग्रामीण भागात बसत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांवर रोग पडत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. वासोळात सध्या हरभरा पीक या संकटाचा सामना करत असून घाटे अळीच्या प्रादुर्भावाने हे पीक हातून निसटेल की काय अशी भीती वासोळ येथील शेतकऱ्यांना वाटत आहे.
पावसाळी वातावरणामुळे कोळपणी झाल्यानंतर हरभऱ्याला रासायनिक खतांची मात्रा देणे थांबले आहे. अशा परिास्थितीत रासायनिक खतांची फवारणी केली तरी त्याचा प्रत्यक्ष पीकाला कोणताही उपयोग होणार नाही. तसेच खतावरील खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. समाधानकारक वाढ झालेल्या हरभरा पिकावर पावसाळी आणि ढगाळ वातावरणाने विपरित परिणाम झाला आहे.
हरभरा पीक हाताशी आले असताना काही भागात घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे.
यंदा हरभऱ्याची वाढ जोमदार झाली. दोन दिवसांपुर्वी शेतकऱ्यांनी कोळपणी केली. अचानक आलेल्या पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने हरभऱ्याला रासायनिक खतांची मात्रा देणे थांबले आहे. हे वातावरण निवळले तर रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणता येईल. परिणामी हरभऱ्यापासुन यंदा बऱ्यापैकी कमाई होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग
तालुक्यात सुमारे हजारो हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गहु, हरभरा, मका, कांदा या पिकांचा समावेश आहे. यंदा पाऊस जास्त झाल्याने भुगर्भातील पाण्याची पातळी उंचावली. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यांविषयी शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. आता हा प्रादुर्भाव आटोक्यात कसा आणायचा या विवंचनेत बळीराजा अडकला आहे.
![](https://www.kasamadetimes.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240125-WA0122.jpg)