माहेर घरीच कांदा कमी , ग्राहकांना रडविण्याची हमी ?
1 min read
वासोळं: प्रशांत गिरासे –

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” करीता –
नाशिक विभागात खरीप हंगामातील लाल कांदा लागवड क्षेत्रात यंदा काही अंशी घट आली आहे. त्यामुळे विभागातील कांदा उत्पादनाची भिस्त आता लेट खरीप व उन्हाळ कांद्याच्या लागवडीवरच अवलंबून राहणार आहे.
नाशिक विभागात खरीप हंगामातील लाल कांदा लागवड क्षेत्रात यंदा काही अंशी घट आली आहे. त्यामुळे विभागातील कांदा उत्पादनाची भिस्त आता लेट खरीप व उन्हाळ कांद्याच्या लागवडीवरच अवलंबून राहणार आहे.
दरवर्षी मातीमोल भावात कांद्याची विक्री करावी लागत असल्याने मेटाकुटीस आलेला शेतकरी इतर पिकांकडे वळल्याने कांदा पिकाच्या लागवड क्षेत्रात घट झाली असण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात ग्राहकांना रडविण्याची तर शेतकऱ्यांना खुश करण्याची शक्यता आहे.
विभागात यंदा खरीप हंगामात २६ हजार ८२० हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. त्यापैकी ३२४ हेक्टर क्षेत्र जळगाव जिल्ह्यातील लेट खरिपाचे आहे. त्यामुळे उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात २६ हजार ४९६ हेक्टर इतक्या क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. यंदा काही प्रमाणात कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट आली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाल कांद्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्यास लाल कांदा ग्राहकांना रडविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माहेरघरीच कमी प्रतिसाद
विभागातील नाशिक जिल्हा कांद्याचे माहेरघर मानले जाते. नाशिकसह शेजारच्या नगर जिल्ह्यातही खरीप हंगामातील कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय खान्देशातील धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही खरीपात कांद्याची आगाऊ लागवड होते. मात्र, यंदा या सर्वच जिल्ह्यांमध्ये खरीप कांद्याच्या लागवड क्षेत्रात काही प्रमाणात घट आले आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्रातील घट विभागाच्या कांदा उत्पादनावर मोठा परिणाम करणारी ठरते.